भाग १: जयपूर- मुंबई- पुणे- कुर्डूवाडी
आयुष्यातील तो एक दिवस...खरंच काय चालू आहे काय माहित नाही?
या पावसाळ्यात काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
नेहमीसारखाच तो एक प्रवास होता.
तोच तो जयपूर- मुंबई- पुणे प्रवास...अगदी अदभुत असा तो रेल्वेचा प्रवास, प्रत्येक वेळेस नवीन आठवणींनी भरलेल्या प्रवासाची मजाच वेगळी!
रेल्वेत बसण्यापूर्वी रिझर्वेशन चार्ट बघण्याची असलेली घाई, आपल्या सीटच्या बाजूला कोणी 'F' आणि १८-२५ या दरम्यान कोणी आहे का नाही आणि आपला प्रवास सुखकर असणार की नाही याची रंगवलेली रम्य स्वप्न, अशा अनेक गोष्टींनी युक्त असा प्रत्येक रेल्वे प्रवास कदाचित त्यात भेटलेल्या विशिष्ट व्यक्तींनी अगदी रमणीय झाला हे मात्र नक्की!
रिझर्व्हेशन चार्ट बघून झाल्यावर रेल्वेत बसण्याची ती घाई, निवांत कानात हेडफोन्स टाकून प्रवासाची घेतलेली मजा, कधीतरी पुस्तकांची घेतलेली मजा, सर्वकाही निवांत सोडून आयुष्य जगण्याचे ते क्षण...
असच एकदा निघालो होतो,
प्रवासाचा मार्ग होता, राजस्थान- गुजरात- महाराष्ट्र,
प्रवासात किती अडथळे येऊ शकतात, घरी येण्यासाठी असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि एखाद्याचे नशीब किती बलवत्तर असू शकते याचा आलेला त्यादिवशीचा प्रत्यय खरंच "न भूतो न भविष्यती" असच होता.
प्रवासास सुरुवात अगदी व्यवस्थित झाली. सकाळी १० वाजता ट्रेन मध्ये बसलो. त्या काळात राजस्थान मध्ये जातीय अशांतता होती. लोक रेल्वे रुळ उखडून टाकत होते. नशीब बलवत्तर म्हणा की फक्त आमची ट्रेन वेळेवर बाहेर पडली. आमच्या नंतरची प्रत्येक ट्रेन ४-५ तास उशिराने धावत होत्या.
खरं तर नशिबाने तिथून व्यवस्थित बाहेर पडलो.
नंतर गुजरात मध्ये देखील अशीच परिस्थिती होती. त्यातून देखील अगदी सुखरूप बाहेर पडलो.
एकदा महाराष्ट्रात आले की मन शांत झाले. परत मुंबई वरून कुर्डूवाडी साठी ट्रेन मध्ये बसलो. खरं तर मुंबई-कुर्डूवाडी हा मार्ग परीचयाचा होता पण वेळ रात्रीची होती.
रेल्वे भिगवण येथे २ तास रात्री १-३० am च्या दरम्यान थांबली. माझ्यासारखे काही अतिउत्साही तरुण खाली उतरले आणि थांबले. बाकी सर्वजण निवांत ट्रेन मध्ये झोपले होते. या भिगवणमध्ये रात्री रेल्वेवर दरोडे पडतात याविषयी आम्हाला माहित नव्हते पण मागच्या स्टेशन वर पोलिसांनी सर्व दारे व खिडक्या बंद केली होती. आमची ट्रेन पुढे निघून गेली. पण आमच्या मागच्या ट्रेन ला भिगवण ला त्याच दिवशी लुटले. आम्ही पुन्हा वाचलो.
आता कदाचित २-२.३० am वाजले होते. कुर्डूवाडी यायला अजून १-१.३० तास वेळ होता. आम्ही दोघे जन आळीपाळीने अर्धा तास जागावे असे ठरवले. पण ज्यावेळी कुर्डूवाडी स्टेशन आले त्यावेळेस आम्ही दोघेही झोपलेलो होतो. कदाचित दिवसभराच्या प्रवासाने क्षीण झालेले शरीर थकले होते. ट्रेन २ मिनिटे थांबली आणि ट्रेन निघण्याची शिट्टी झाली. अचानक त्याने मला उठवले. मी अगदी वरच्या बेडवर होतो झ तसाच खाली उडी मारली आणि मोठा आवाज झाला. मी माझे साहित्य घेतले आणि लगबगीने झाली उतरलो. जसा झाली उतरलो तसाच ट्रेनने वेग घेतला. अगदी १ मिनिटं जरी उशीर झाला असता ना तर आम्ही सोलापूरलाच पोहचलो असतो.
एकाच प्रवासात गुजरातमधील दंगल, राजस्थानमधील गोंधळ, मुंबईतील लोकल, भिगवण मधील दरोडा आणि सकाळी ३ वाजता शेवटच्या क्षणाला ट्रेन मधून बाहेर पडलेला आम्ही, आणि हे सर्व एकाच दिवसात! खरंच तो दिवस अविस्मरणीय, अदभुत आणि अद्वितीय होता यात काही शंकाच नाही.
तर असा हा एक प्रवास अनुभव...
आवडला...?
तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते खाली कमेंट मध्ये नक्की कळवा. तुमचा एखादा प्रवासातील किस्सा देखील शेअर करा.
तुम्हाला असे अनुभव वाचायला आवडतील?
तर नक्की कमेंट करा.
आणि नक्की शेअर करा.
~संकेत तांबारे,
इमेल: sanket.tambare@pm.me

Comments
Post a Comment